जालना (वृत्तसंस्था) :- कार्यकारी अभियंता, जायकवाडी प्रकल्प, पैठण यांनी दिलेल्या संदेशानुसार दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता प्रकल्पाचा जिवंत पाणीसाठी 96.31 टक्के आहे. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशयाच्या धरणातून गोदावरी नदीमध्ये एकुण 80 हजार 672 क्युसेक विर्सग सुरु आहे. पाण्याची आवक पाहून विर्सग वाढविणे / कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, तरी नदी काठच्या नागरिकांनी सावध राहावे.
तसेच कार्यकारी अभियंता, खडकपुर्णा, दे.मही जि. बुलढाणा यांनी दिलेल्या संदेशानुसार दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4.00 वाजता खडकपूर्णा प्रकल्पाचा जिवंत पाणीसाठी 91.29 टक्के आहे व पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे खडकपुर्णा पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने खडकपुर्णा प्रकल्प, दे. मही जि. बुलढाणा धरणातुन पुर्णा नदीमध्ये एकुण 44408.48 क्युसेक विर्सग सुरु आहे. पाण्याची आवक पाहून विर्सग वाढविणे /कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल, तरी नदी काठच्या नागरिकांना सावधनतेचा इशार देण्यात आला आहे.
नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहणेबाबत तसेच चल-मालमत्ता, चिजवस्तू, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविणेबाबत दवंडीद्वारे सूचित करावे व पुरापासून सावध राहण्याचा इशारा देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, अंबड/परतूर, तहसीलदार अंबड/घनसावंगी/परतूर/मंठा यांना दिले आहेत. नागरिकांच्या जिवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.
जायकवाडी प्रकल्प व खडकपुर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
