मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-19 प्रकरणात निरंतर वाढ होत असल्याने राज्य सरकार 1 मे ते 15 मे या कालावधी साठी लॉकडाउन सारखी निर्बंध वाढवण्याची शक्यता आहे. बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुंबईत कोरोनाचे प्रकरण कमी झाले आहेत पण राज्यातील इतर भागांत अजून घट झाली नाही. “राज्यात कडक निर्बंध लावल्या नंतर मुंबईत कोविडची प्रकरणे कमी झाली आहे, पण विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांत अजूनही ते वाढत आहे.” परिस्थितीचा आढावा घेऊन मंत्रिमंडळ निर्णय घेईल असे ते म्हणाले.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनली असून ऑक्सिजन बेड, रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. वैद्यकीय यंत्रणेवर भारी ताण पडला असून अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारयाला नर्सिंग स्टाफही मिळेना झालाय. त्यामुळे, 1 मे नंतरही राज्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकारने 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. पण, त्यापुढेही लॉकडाऊन वाढणार असल्याचं अनेकांचं मत आहे.
मोफत लसीकरणाचा निर्णय बैठकीत होईल.
संपूर्ण देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. एक मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट लसीकरण चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोफत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. पण सध्यातरी असा कुठलाही निर्णय झाला नाही. महाविकासआघाडी एकत्र बैठकीत मोफत लसीकरणाबाबत निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. कात्रज येथे कोव्हिडं सेंटरच्या उदघाटनासाठी ते आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.